सरस……. (गड)
सरस……. (गड)
दि. २१. ७ . २०१३ रोजी दुर्गवीरचे अवघे ७ शिलेदार मिळून आम्ही सरसगड (पाली) येथे जायचे ठरविले . सकाळी ६:२०मि. ट्रेन दिवा स्टेशन येणार होती. नितीन दादा तर सकाळी ४:३० पासूनच संपर्कात होते. प्रश्नात वाघरे बंधू अनफिट असल्याने त्यांनी माघार घेतली होती. कोणं कोण येणार याची फार मोठी उत्सुकता होती. राज, सुरज, नितीन हे येणार इतक पक्क होत. सकाळी समजल "अल्लाउद्दिन चा जीन" (हर्षद मोरे ) येणार आहेत मी आणि हर्षद बंधू दिवा ला भेटलो. बसायला जागा कुठे दिसत नव्हती जरा पुढे गेल्यावर जागा दिसली लगेच तिथे स्थानापन्न झालो पण नशीब खराब आमच गाडी अर्धा तास लेट, मग काय सुरुवात चिंतनाला त्यात समजल आमचे डोंबिवली चे धष्टपुष्ट व्यक्तिमत्व प्रशांत अधटराव बंधू येतायत त्याचं नशीब चांगल गाडी लेट झाली म्हणून मिळाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर माझे चिंतन सुरु झाले आणि प्रश्नात व हर्षद बंदुंचे "निरीक्षण" सुरु झाले. शेवटी गाडी पोचली पनवेल ला तिथे नितन, राज, सुरज, अजित कोकीतकर बंधू आमच्यात सामील झाले. पुढे हर्षद बंधूनी आणलेल्या इडली चटणी वर यतेच्छ ताव मारत गप्पा गोष्टी करत पोचलो एकदाचे नागोठणे ला तिथून टमटम ने पोचलो सरसगड च्या पायथ्याशी. आज मात्र पावसाने चांगलीच दांडी मारली होती. पाउस नसल्याने मस्त रमतगमत निसर्ग न्याहाळत आम्ही गडाची चढाई सुरु केली. आमचे हर्शल बंधू हळूहळू जरा जास्तच निसर्ग न्याहाळत गड चढत होते. पुढे उभ्या काताळात पाय-या आहेत त्या पार करायच्या होत्या अगोदर विचार केला पाय-या त्या तर रोजच चढतो. आम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये जाऊ लागलो पण पाय-यावर असलेली शेवाळ त्यात काही पाय-या तुटलेल्या असल्याने घसरून थेट दरीत कोसळण्याची भीती त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स जरासा कमी झाला. पण हार मानली तर दुर्गवीर कसले म्हणून आम्ही हळू हळू एकमेकांना धीर देत वर चढू लागलो दोन्ही बाजूना विशाल कातळ त्या काताळासामोर आपण जणू किसपटा प्रमाणे भासत होतो. वळून खाली बघितलं तर खोल दरी दिसत होती त्यामुळे वळून खाली बघण्याच्या फंदात न पडता आम्ही त्या पाय-या पार केल्या. पाय-या पार केल्यावर गड सर केल्याच्या आनंदात जोरदार घोषणा दिल्या. पाय-या पार केल्यावर दर्शन झाले सुबक आणि मजबूत महादरवाजाचे. इतक्या वर्षानंतरहि हा दरवाजा अभेद्य होता. पुढे आमची चढाई सुरु राहिली. आजूबाजूचा परिसर न्याहाळत आम्ही निघालो. काही निसरड्या ठिकाणी स्वताला सावरत आम्ही पुढे पुढे निघालो. वरून खाली पाहिल्यावर अफाट निसर्ग दिसत होता जणू काही स्वर्गच..... पुढे उजव्या बाजूने आम्ही पुढे चालू लागलो गडाला असलेला अभेद्य असा बुरुज न्याहाळत आंम्ही पुढे जाऊ लागलो. पोटात फारस काही नसल्याने सगळे कधी एकदा जेवतोय असा विचार करतच पुढे जात होते. आम्ही सर्वजण प्रथमच सरसगड वर आलो होतो त्यामुळे वाट मिळेल तिथून पुढे चालत जात होतो. जितका वेळ आहे त्यात सर्व परिसर पिंजून काढायचा असं आम्ही ठरवलं होत. पुढे उजव्या बाजूने पुढे गेल्यावर पुढे उभ्या डोंगराला फेरा मारून पुढे जात होतो. वाटेत येणा-या पाण्याच्या टाक्या, डोंगरात कोरलेल्या टाक्या आणि धान्य कोठार सदृश्य वास्तूंचे निरीक्षण करीत आम्ही पुढे जाऊ लागलो. एका गुहेत काही ऐतिहासिक संदर्भ नसताना अगदी व्हाईट सिमेंटने तयार केलेली ""हिरवी" वास्तू दिसली. हि अशी "हिरवी शेवाळ" दिसली कि रक्त अक्षरश: खवळून उठत. पण दुस-या क्षणी आपण एक "दुर्गवीर" असल्याची जाणीव झाली आणि माझा संताप आवरून पुढे निघालो. डोंगरात कोरलेल्या टाक्या व गुहा पाहून आंम्ही अचंबित व्हायचो. पुढे आम्ही एका शिवमंदिराजवळ गेलो पण तिथली परिस्थिती फारच गंभीर होती. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी पाणी साचल होत मंदिराच्या गाभा-यात दीड - दोन फुट उंच पाणी साचल होत.पाणी आत आल्याने शिवपिंड पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. प्रथम दर्शनी आम्हाला वाटलं कि जास्त पाणी साचलं म्हणून आत शिरलं असेल म्हणून आम्ही दुर्गवीर च्या शिलेदारांनी ते पाणी बाहेर काढून गाभारा स्वच्छ करायचं ठरवलं. बाजूला असलेला एक पत्र्याचा डबा घेऊन आम्ही पाणी उपसायला सुरुवात केली पण आम्हाला पुढच्या १० मिनिटात कळून चुकल कि आम्ही चुकीच्या ठिकाणी मेहनत करतोय. मंदिराच्या एका बाजूने छोट्याश्या कपारीतून पाणी आत येत होते पण यावर काहीतरी कायमचा उपाय व्हावा अशी मनाची समजूत घालून आम्ही पाणी उपसायचं काम थांबवल. नंतर त्याच पाण्यात उभे राहून भगवान शंकराची आरती आणि शिवरायांचा जयघोष करत आम्ही थोडी विश्रांती घ्याय़च ठरवलं. सर्वांनी आपापले डबे काढून जेवणाला सुरुवात करावी अस ठरल. नेहमीप्रमाणे आमच्या नितीन बंधूनी "आईची माया" (राइस) आणली, आणि आमचे "अल्लादिन चे जीन" हर्षद बंधूनी चटणी आणि भाकरी काढली प्रत्येकाने आपापला वाटा काढून घेतला. आमचे प्रशांत बंधूनी आपला वाटा घेऊन बाजूला गेले. नितीन बंधूनी आपला वाटा घेतला उरलेल्या वाट्यात मी, सुरज, अजित कोकितकर, राज बंधू adjust करणार होतो. आम्ही ४जण आहोत हे पाहून हर्षद बंधूनी नितीन बंधूच्या वाट्यात adjust करायचा निर्णय घेतला पण हर्षद बंधूंचा हा निर्णय त्यांचा चांगलाच "अंगाशी" (पोटाशी) आला नितीन बंधूनी हर्षद बंधूना फारसा स्कोप न दिल्याने त्यांना अर्धपोटीच राहावं लागलं आम्ही चौघांनी मात्र adjust करून पोटाला ब-यापैकी आधार दिला. आता वेळ होती दुर्गदर्शनाचा परतीचा प्रवास करण्याची पुन्हा आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. येताना जसे आम्ही संपूर्ण परिसर न्याहाळत आलो तसच पुन्हा जाऊ लागलो. जातां जाता आमचे अजित कोकितकर बंधूंची नजर डोंगरावर कोरलेल्या काही चित्रांकडे गेली. तस मी पण ते चित्र न्याहाळू लागलो.प्रथम एक हात दिसला जसा एखाद्या सती शिळे वर असतो नंतर एक धनुर्धारी व्यक्ती दिसली (धनुष्य बाण ताणून धरलेली व्यक्ती दिसली) त्याच्या समोर अगोदर फक्त भाल्याच चित्र दिसलं. हळू हळू राज बंधूनी त्यावर तिथल्याच एका पांढ-या दगडाने चित्र रेखाटल तेव्हा ते अजून स्पष्ट दिसू लागल. आता मात्र चित्र स्पष्ट दिसत होत एक धनुर्धारी धनुष्य ताणून असलेला त्याच्या समोर एक दुसरी व्यक्ती (स्त्री कि पुरुष याबाबत शंका होती) ज्याच्या हातात भाला होता. धनुर्धारी व्यक्तीच्या समोर एक प्राणी होता कदाचित कुठला तरी जंगली प्राणी असावा. तो प्राणी धनुर्धारी व्यक्तीच्या समोर उभा होता पण त्याचे तोंड मागच्या बाजूला म्हणजे भाला धरलेल्या व्यक्तीच्या दिशेने होते. नक्की तो प्राणी कोण आणि तो कोणावर हल्ला करत होता हे नीटस दिसत नव्हत. कारण काही महाभागांनी तिथे पेंट ने स्वताच्या व स्वताच्या सौ (भविष्यात होणा-या सौ ) च नाव कोरून ठेवल होत. खरच यांनी एवढे काय पराक्रम केलेत कि यांच नाव कोरल जाव. त्यांच्या या (वि)कृतीने एक इतिहासाचा ठेवा आपण नष्ट करतोय याची थोडी सुद्धा कल्पना नसेल का त्यांना??? नंतर नितीन बंधूनी एका वहीवर ते चित्र नेमक कस असेल याचं एक अंदाजे चित्र काढल. आणि नेहमीप्रमाणे आम्ही आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याच दुर्गवीर च शिवकार्य पार पाडत सरस गडाचा निरोप घेऊ लागलो.
पुढे उतरताना आमचे हर्षद बंधू Seating पोझिशन मध्येच गड उतरले. मध्येच नितीन बंधूनी त्यांना कमरेवर हात ठेवून (विठ्ठला प्रमाणे ) चालावे मग Confidence वाढतो व चालताना आपला Balance जात नाही असा सल्ला दिला. पण अर्थातच हर्षद बंधूनी तो मानला नाही कारण नितीन बंधूंचाच पाय २-३ वेळा घसरला होता.असे आम्ही मजल दर मजल करीत हळू हळू सरसगड उतरलो. आणि "सरस" अशी "सरसगड" ची दुर्गदर्शन मोहीम "सरसपणे" पार केली.
सरसगड (पाली) च्या या मोहिमेत गडाच व आजूबाजूच्या परिसराच अप्रतिम सौदर्य, गडावरील डोंगरातील कोरलेली अप्रतिम युद्धशिल्पांची चित्रे आणि त्या चित्राच्या माध्यमातून स्पष्ट होणारा आपल्या संस्कृतीचा सखोल इतिहास परंतु काही अविचारी / मूर्खांच्या चुकीमुळे नष्ट होत असलेला इतिहास, आणि पायांचा वापर न करता बसून गड कसा उतरावा हे हर्षद बंधूंचे प्रात्यक्षिक असे अनेक सरस अनुभव देणारी सरसगड हि एक यशस्वी दुर्गदर्शन मोहीम
जय शिवराय
Comments
Post a Comment