सुसाट… भन्नाट… वेगात…



सुसाट… भन्नाट… वेगात… 

गेल्या वर्षभरात मी दुर्गवीरांना आणि वीरांगणांना श्रमदान करताना पाहत आलो सगळे अगदी जोमाने श्रमदान करायचे मग ते काम पायवाटेचे असो वा पाण्याच्या टाक्यांच दुर्गवीर आणि वीरांगणा नेहमी सेवेच्या ठायी तत्पर… पण आज प्रथम बाईक वर सुसाट…  भन्नाट…  आणि वेगात…   असलेले दुर्गवीर आणि वीरांगणा पहिले.  औचित्य होत "गुढीपाडवा / नववर्ष निमित्त मुंबई ते उंबरखिंड स्वागत फेरी"… 
तसे नेहमी ट्रेन किंवा महेश दादाची गाडी (विमान) घेऊन जाण श्रमदान करण आणि श्रमदान करून परत येण  हा आमचा नेहमिच्या मोहिमांचा उपक्रम पण आजची मोहीम काही वेगळीच होती. आम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल ला एकत्र येणार होतो. मी, अजित दादा, प्रशांत दादा, ओजास्विनी ताई, संतोष दादा ठाणे ला भेटून पनवेल ला पोचलो तिथे अगोदर काही जण पोचले होते. नेहमीप्रमाणे आमच्या महेश दादाच विमान उशिराने सुटल त्यामुळे आम्ही सर्वजन पनवेल ला त्याच विमान यायची वाट पाहत होतो. सगळे जमा झाले.  नंतर नारळ फोडून मोहिमेला सुरुवात झाली. सर्वांनी आपापल्या बाईक ला भगवे झेंडे बांधले (ज्यांच्याकडे आपली बाइक नव्हती त्यांनी  ते झेंडे  बांधायला मदत केली अजून काय करणार) मग मध्येच कुणीतरी फेट्याचा विषय काढला आणि मी माझ्या ब्यागेतून फेट्याचा कपडा काढला अनिकेत दादा ने छानसा फेटा बांधला वरती मस्त पैकी "तुरा" पण काढला.   मी एकटाच "फेटा मिरवत" "तो-यात"(तू-यात) निघालो पण तो "तोरा" फार काळ टिकला नाही कारण फेट्याचा "तुरा" झोपी गेला.(कपडा जरा जुना होता म्हणून हा!! नाहीतर अनिकेत दादा ला वाईट वाटायचं). मी गपचूप ते कपडा गळ्यात ठेवला आणि शांत बसलो.  नंतर लगबग सुरु झाली कोण कोण्याच्या बाईक वर बसणार मी अगोदरच देवेंद्र पारकर याच्या बाईक वर जागा फटकावलि. राज दादा चा खरा तर हक्क होता त्यावर तो मी हिरावून घेतला आता राज दादा विस्थापिता सारखा इकडे तिकडे बाईक शोधू लागला नंतर त्याला पण मिळाली एक जागा तोही खुश!!! मग सुरु झाला आम्हा दुर्गवीरांचा / वीरांगनांचा सूसाट…. भन्नाट…. वेगात… असा प्रवास
सर्व निघालो कधी आम्ही मागे तर कधी पुढे… रस्त्याने भगवे झेंडे लावलेल्या बाईक ची लांबच लांब रांग आणि अधून मधून शिवरायांचा जयघोष अगदी शिवमय आणि उत्स्फूर्त वातावरणात आमचा प्रवास चालला होता मध्ये मध्ये थांबत आमचा प्रवास संपला तो उंबरखिंडीच्या पायथ्याशी एका घराजवळ तेथे चहापान झाल. सर्व बाइकस्वारांनी आपले पाय मोकळे केले आणि पुन्हा रान मोकळ मिळाल्यासारखे बाइक पळवत उंबखिंडीत निघाले ज्या खिंडीत कारतलब   खानाला हाल हाल होऊन पराभूत होऊन मागे परतावं लागल त्या खिंडीतून आम्ही भगव्या निशानाची दौड सुरु होती.  जाणवत होत त्या उंबर खिंडीच वैशिष्ट तीनीही बाजूना डोंगर आणि मधोमध ती जागा खानाने तिथे इतक अफाट सैन्य आणि लवाजमा  आणला आणि तोंडघशी पडला. अभिमान वाटू लागला आपल्या राजेंच्या बुद्धिमत्तेचा एवढ्या अफाट सैन्याला मुठभर सैन्याच्या मदतीने धूळ चारली. खरच या प्रसंगातून स्पष्ट होत होता युक्ती आणि शक्ती यांचा मिलाफ…. शिवरायांनी  कारतलब  खानाला अगदी युक्तीपुर्वक या खिंडीत आणल नंतर याच खिंडीत त्याच्या सैन्यावर चाहोबाजुनी आक्रमण केल तेव्हा खानासमोर दोनच पर्याय होते हरायचं किंवा मारायचं पण पळपुट्या खानाने शेवटी हरायचं कबुल केल(हरण्यापेक्षा मरण पत्करायला तो काही "शिवरायांचा मावळा" नव्हता) आणि अश्या एका लढाईत ज्यात राजे स्वत प्रत्यक्षरित्या सामील झाले होते त्यात ऐतिहासिक असा विजय मिळवला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली उंबर खिंड

आम्ही सर्व त्या पावन भूमीत प्रवेश केला आणि नतमस्तक झालो त्या राजेंच्या चरणाशी. गेल्या गेल्या आम्हाला नजरेस आल कि तेथल्या भगव्या ध्वज स्तंभांवरील भगवा ध्वज काहीसा चांगल्या अवस्थेत नव्हता पण चढणार कोण त्या स्तंभावर मग काय "एकच नाव एकाच पर्याय अमित शिंदे अपना भाय " आपल्या टारझन या नावाला साजेसे काम करत अमित बंधू सरसर खांबावर चढले दुसरा एक भगवा त्याठिकाणी लावून सरसर खाली पण उतरले(गेल्या जन्मी नक्कीच मावळे असणार कुठेही चढू शकतात अमित बंधू). समोरच एक स्मारक आहे तिथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांची आरती, जयघोषाने परिसर दुमदुमून टाकत आम्ही पुढे गेलो. नंतर आम्ही सर्वांनी मिळून इतिहास जागवला संतोष  दादा ने सर्वांना बोलण्याचा आग्रह केला (मी बोलन टाळल!! कशाला उगाच सर्वाना घरी जायचं होत उगाच बोलायला लागलो तर थांबत नाही… ) नंतर आपल्या परीने परिसर न्याहाळून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. जेवण करून आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघणार होतो.  ज्यांना लवकर घरी पोचायचं ते महेश दादाच्या गाडीने(विमानाने) गेले.  आणि आम्ही आलो तसे पुन्हा बाईक ने जाणार होतो आता देवेंद्र पारकर बंधूनी रथाची मालकी पालव बंधूंकडे दिली होती (मी चालवलि असती हो!!!  पण कशाला उगाच दुस-याच्या वस्तूला हात लावा!! आणि ती वस्तू "तुटणारच" हे १००% माहित असल्यावर मुद्दाम कशाला रिस्क घ्या )… 
पुन्हा आमचा प्रवास थांबला आमच्या मराठी फेसबुक परिवार चे सर्वेसर्वा प्रज्वल पाटील यांच्या घरी त्यांच्या घरी कोल्डड्रिंक  मग चहा मग बिस्कीट मग पुरणपोळी असा खमंग नाष्टा करून आम्ही पुन्हाला निघालो मग सर्व वेगवेगळ्या दिशेला विखुरले आणि पोचले आपल्या इच्छित स्थळी….
मी गेल्या वर्षभरात पहिल्यांदा सर्व दुर्गवीरांना आणि वीरांगणांना श्रमदानाशिवाय सुसाट… भन्नाट… वेगात… पहिले खरच मन भरून आले… 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….